रंग हे नवे नवे नवीन पॅटर्न हा पूर्ण नवीन अभ्यासक्रम, नवे धोरण, नवीन दृष्टिकोन घेऊन आला आहे. तेव्हा पूर्वीच्या पद्धतीने याकडे बघून चालणार नाही. मनात कोणतेही पूर्वग्रह न ठेवता जर आपण उल्हासित मनाने त्याला सामोरे गेलो तर खूप आनंददायी अनुभव येईल. आपल्या वैचारिक जाणिवा विकसित करून आपली अभिव्यक्ती, विचार मांडण्याची संधी या पद्धतीत मिळणार आहे.
मुख्य बदल
१) माध्यमाची निवड : जुन्या पद्धतीत पर्यायी स्वरूपामुळे माध्यम निवडीचा प्रश्न नव्हता. प्रश्न इंग्रजी व मराठी छापून येत. आता उत्तर लेखनाचे माध्यम निवडावे लागेल. यूपीएससीमध्ये पूर्ण माध्यम घ्यावे लागते. एक तर सगळे पेपर मराठीत लिहा किंवा इंग्रजीत. फक्त वैकल्पिक विषयाच्या बाबतीत सूट आहे. सामान्य अध्ययन मराठीत लिहिले तरी वैकल्पिक विषय इंग्रजी माध्यमातून लिहिता येतो. पूर्वी जेव्हा राज्यसेवा वर्णनात्मक होती तेव्हा वेगवेगळ्या पेपरला वेगळे माध्यम लिहायची सुविधा दिली होती. आता काय नियम असेल हे अजून स्पष्ट नाही.
२) मुख्य परीक्षा : पर्यायी ऐवजी वर्णनात्मक. एक ओळ किंबहुना एक शब्द जरी अर्थपूर्ण लिहायचा असेल तर त्यासाठी त्यामागे विचार असावा लागतो. उचलला पेन आणि लावला कागदाला असे करून चालत नाही. अर्थपूर्ण लिहिण्यासाठी विचार, चर्चाविश्व विकसित करावे लागते. जोवर हे समजून घेऊन आपण आपली माहिती आतमध्ये घ्यायची पद्धत बदलणार नाही (स्मरणशक्ती आधारित अभ्यास ते कार्यकारण भाव समजून घेऊन केलेला अभ्यास) तोवर यश हुलकावणी देत राहील हे निश्चित.
३) लेखन कला – केंद्रबिंदू : आधी पर्यायी प्रश्नांमध्ये प्रामुख्याने तर्कशक्ती व स्मरणशक्ती पणाला लागत होती. आता लेखन हे मर्म आहे. खूप लिहायचे आहे. (२७ तासात २७००० शब्द) तेही दिलेल्या कालकक्षेत. अशावेळी शब्दांची निवड, भाषेवरील पकड, प्रभावी अभिव्यक्ती यांची गरज भासणार आहे. उत्तर लिहिणे व तज्ज्ञांकडून तपासून घेणे ही प्रक्रिया अनिवार्य. लिहिण्याचा सराव करुन रिफील संपल्या पाहिजेत. स्पष्ट करा, वर्णन करा, मूल्यमापन करा, समीक्षा करा, मत मांडा, मागोवा घ्या, चर्चा करा, फरक स्पष्ट करा या दिशादर्शक आज्ञांमधील फरक माहिती असणे आता आवश्यक. आता प्रश्नातील प्रत्येक शब्द, प्रश्नाचे भाग, प्रश्नाचा रोख समजून घेऊन उत्तरातून प्रश्नाला उलगडून दाखवायचे आहे. अक्षर देखील वळणदार हवे.
४) नवीन विषय : दुनिया ही नवी नवी अनेक नवीन विषय या प्रवासात सोबतीला आले आहेत. उदाहरणार्थ निबंध, वैकल्पिक विषय, नैतिकता, भारतीय समाज, आपत्ती निवारण, सुशासन, अंतर्गत सुरक्षा, जगाचा इतिहास, पर्यावरण इत्यादी. या सर्व विषयांचा भारांक (weightage) कमी जास्त आहे. वैकल्पिक विषय (५०० गुण), निबंध (२५० गुण), नैतिकता (२५० गुण) असे वजनदार घटक आहेत दुसरीकडे जगाचा इतिहास (सुमारे ४० गुण) आपत्ती निवारण (४० गुण) असे हलके घटक देखील आहेत.
५) वैकल्पिक विषयाची निवड आयोगाने दिलेल्या यादीतून एक वैकल्पिक/ऐच्छिक विषयाची निवड करायची आहे. कोणीही कोणताही विषय निवडू शकतो. तुम्ही बीकॉम असून आरोग्य विज्ञान निवडला तरी चालेल. वैकल्पिक विषयाचे महत्त्व ५०० गुणांचे आहे. (२५% महत्त्व) वैकल्पिक विषयाची अचूक निवड यशात महत्त्वाची भूमिका बजावते. त्याची वेगळी strategy आपण तयार केली आहे. वैकल्पिक विषय तुमचा होम पिच बनला पाहिजे इतके सध्या ध्यानात ठेवा
६) निबंध = कल्पना x वास्तव x सादरीकरण नवीन अभ्यासक्रमात निबंधाचा वेगळा पेपर समाविष्ट झाला आहे. १२५ गुणांचा एक असे दोन निबंध (एकूण गुण २५०) लिहायचे आहेत. (९ ते १० पानांमध्ये एक निबंध) याआधी निबंध फक्त भाषा पेपर मध्ये होते. ते शालेय स्तरावरचे होते व भाषिक अंगाने त्याचा फुलोरा करायचा होता. (‘प्रजासत्ताक व्यवस्था: किती वास्तव किती आभासी’) आता निबंधाचे वैचारिक अंग महत्त्वाचे असणार आहे. (शहाणपण सत्य जाणते) आता अवांतर वाचन करणे, त्याच्याही नोट्स काढणे, रविवारच्या पुरवण्यांचे बारकाईने अवलोकन करणे (उदा. सकाळचे सप्तरंग) आवश्यक ठरले आहे. निबंधाचा विस्तार करणे एखाद्या शास्त्रीय रागाचा मैफिलीत विस्तार करण्यासारखेच आहे. निबंध व्यक्तिमत्वाचा आरसा असतो. निबंध वाङ्मयप्रकार असल्याने त्याचा साहित्याचा कंगोरा असणे गरजेचे! निबंधाला एका सामान्य अध्ययनाच्या पेपरइतके गुण आहेत. (२५०) त्यामुळे त्याचा विशेष अभ्यास केल्यास २० ते ३० गुणांची लीड मिळू शकते. रँक वरती खाली होण्यात निबंधाचा वाटा मोठा असणार आहे.
७) भाषा विषयाचे पेपर आधीच्या पद्धतीत मराठी व इंग्रजी हे भाषा पेपर एकूण २०० गुणांचे होते. (आता ६०० गुणांचे) आधी त्याचे गुण एकूण बेरजेत पकडले जात होते. आता फक्त २५% गुण मिळून पास होणे अपेक्षित आहे. गुण एकूण बेरजेत पकडले जाणार नाहीत. या पेपरचा स्तर दहावीचा असतो. त्यात एक निबंध, उताऱ्यावरील प्रश्न, सारांश लेखन, कवितेचा अर्थ, थोडे व्याकरण यांचा समावेश होतो. थोडक्यात भाषा विषयाचे महत्त्व नवीन पॅटर्नमध्ये कमी झाले आहे. महत्व कमी झाले असले तरी हलक्यात घेणे धोक्याचे.
८) नैतिकता विषय यामध्ये विचारवंत व त्यांचे नीतीविचार, विचारप्रवाह, नैतिकतेची कल्पना – सार्वजनिक व खाजगी, प्रशासनातील नैतिकता याची चर्चा आहे. शिवाय काही व्याख्या विचारल्या जातात. उदाहरणार्थ सचोटी, प्रामाणिकपणा, निष्ठा इत्यादी. त्याशिवाय केस स्टडी सोडवणे हा मजेदार प्रकार असतो. त्यात विशिष्ट परिस्थिती, संकट, पेच देऊन तुम्ही तो कशाप्रकारे सोडवणार हे विचारले जाते.
९) UPSC व MPSC – काय फरक असेल? अभ्यासक्रम शब्दशः सारखा असला तरी राज्यसेवेमधील २५ ते ३० टक्के प्रश्न महाराष्ट्राच्या संदर्भात असतील अशी अपेक्षा आहे. राज्यसेवेतील प्रश्न UPSC सारखे चकवा देणारे नसून सरळ असतील. (जुना अनुभव) फक्त राज्यसेवेची तयारी केली तर चालेल का? चालेल. राज्यसेवेची पूर्व परिक्षा जुनीच राहणार आहे. तिचा विशेष अभ्यास केल्याशिवाय UPSC देणारे उमेदवार मुख्य परीक्षेला पोहोचू शकणार नाहीत. – पण एक धोका आहे. तो म्हणजे आता UPSC चे उमेदवार हिरीरीने राज्यसेवा देणार. त्यांना सुरुवातीला तरी फायदा मिळू शकतो. जुन्या पॅटर्नमध्येसुद्धा बहुसंख्य पोस्ट UPSC करणारे उमेदवारच मिळवत होते हे वास्तव आहे. तेव्हा UPSCचाही गंभीरपणे विचार करायला हरकत नाही. (PSI बनायची इच्छा धरून अभ्यास सुरु करणारे IPS बनले. उदाहरणार्थ विश्वास नांगरे-पाटील. मग राज्यसेवा देणारा उमेदवार UPSC काढण्याचा विचार करू शकतोच की!) राज्य लोकसेवा आयोगाने UPSC चा अभ्यासक्रम तंतोतंत स्वीकारण्यामागे हीच अपेक्षा आहे की जास्तीत जास्त उमेदवारांनी UPSC मध्ये देखील पद मिळवावे.
१०) मुलाखत : तमाम उम्र का हिसाब नवीन पॅटर्नमध्ये मुलाखत जास्त वेळ व तपशीलवार होण्याची शक्यता नाकारता येत नाही. ते डोळ्यापुढे ठेवून आपले व्यक्तिमत्व, आपल्या आवडी व छंद यांची माहिती करून घेणे आवश्यक आहे. (आपुलाची वाद आपल्याशी) एखाद्या विषयाचा अभ्यास करताना त्याचा मुलाखतीत कसा वापर करून घेता येईल यावर एक नजर ठेवावी लागेल. मुलाखतीची एक वेगळी वही करून त्यात जर भर घालत गेलो तर नंतर काम सोपे होईल.
उत्तरपत्रिकेचे रणांगण
१) काळ x काम = वेग जर अभ्यासक्रम UPSC सारखा ठेवला आहे तर प्रश्नसंख्या व त्यांचे गुण यातही UPSC चा पॅटर्न घेतला जाईल अशी शक्यता आहे. एका सामान्य अध्ययन पेपर मध्ये १० गुणांचे १० प्रश्न (प्रत्येकी १५० शब्दांचा) व १५ गुणांचे १० प्रश्न (प्रत्येकी २५० शब्दांचा) विचारले जातात. सर्वच प्रश्नांची उत्तरे द्यावी लागतात. दहापैकी सात लिहा असे लाड नाहीत. गुणांचे गणित : (१० x १०) + (१५ x १०) = २५० गुण शब्दांचे गणित : (१५० शब्द x १०) + (२५० शब्द x १०) = ४००० शब्द तीन तासात (१८० मिनिटात) २५० गुणांसाठी ४००० शब्द म्हणजे मिनिटाला २२ शब्द. तेही समर्पक, संक्षिप्त आणि अर्थपूर्ण.
२) गोळाबेरीज सामान्य अध्ययन १,२,३,४ मिळून १६००० शब्द निबंध (सुमारे १००० शब्दांचा एक असे दोन म्हणजे) २००० शब्द वैकल्पिक विषय ८००० शब्द दोन भाषा विषय, सुमारे १००० शब्द असे गणित आहे. म्हणजेच मुख्य परीक्षेत एकूण २७ तासात २७००० शब्द असे हे गणित आहे.
३) जिंदगी लंबी नही, बडी होनी चाहिए आयोग उत्तराच्या लांबीपेक्षा आशयाला जास्त महत्व देतो हे विसरता कामा नये. जेव्हा १५० शब्द असे नमूद केले असते तेव्हा त्याचा अर्थ जास्तीत जास्त १५० शब्द असा होतो. जर उत्तर त्याआधीच संपले तरी हरकत नाही. (म्हणजे एकतर तितकेच उत्तर प्रश्नासाठी पुरेसे असते किंवा आपली विहीर आटते) पुन्हा तेवढे शब्द आलेच पाहिजे असेही काही नाही. आकृत्या,फ्लोचार्ट ,नकाशेही चालतात.उत्तराचे रूपांतर समर्पक आकृत्यांमध्ये करता आले तर परीक्षकांना जो आनंद होतो तो त्यांनी दिलेल्या गुणांमध्ये प्रतिबिंबित होतो. गणित सोपे आहे, उत्तर समजण्यास जितके सोपे व अर्थपूर्ण तितके गुण जास्त. (RRW Read-Revise-Write)
नव्या दिशेचा शोध
१) अभ्यासक्रमाची ओळख अभ्यासक्रमाची तपशिलात ओळख करून घ्या. काना, मात्रा, अल्पविराम, स्वल्पविराम व पूर्णविरामासकट. फक्त मुख्य परीक्षेतील घटक, फक्त पूर्व परीक्षेतील घटक व दोन्हीकडील घटक हे धडाधड सांगता आले पाहिजेत. अभ्यास पूर्ण होणारे विषय (नैतिकता, वैकल्पित विषय, भारतीय समाज इत्यादी) व प्रक्रिया चालू राहणारे विषय (अर्थशास्त्र, राज्यव्यवस्था, आधुनिक भारत) अशाप्रकारची विभागणी देखील डोळ्यासमोर असली पाहिजे. ढोबळमानाने फक्त मुख्य परीक्षेचे आधी (नैतिकता, वैकल्पिक विषय, निबंध, जगाचा इतिहास, भारतीय समाज, अंतर्गत सुरक्षा, आपत्ती निवारण, उपयोजित विज्ञान, सुशासन), नंतर दोन्हीमधील कॉमन (अर्थव्यवस्था, राज्यव्यवस्था, आधुनिक भारत, कला व संस्कृती, भारतीय भूगोल व पर्यावरण) व शेवटी फक्त पूर्व परीक्षेतील (जगाचा भूगोल, प्राचीन व मध्ययुगीन भारत, सामान्य विज्ञान, CSAT) असा क्रम ठेवावा लागेल. फक्त मुख्य परीक्षेचे घटक पहिल्या सात महिन्यात आटोपते घ्यावे लागतील, कॉमन घटक एकदा चालू केले की थेट मुख्य परीक्षेपर्यंत चालतील व पूर्व परीक्षेचे घटक परीक्षेच्या चार महिने आधी हातात घेणे उत्तम.
२) मागील प्रश्नांचा आढावा (PYQ) मागील प्रश्न बघितल्यावर अभ्यासाची खोली किती ठेवायची याचा अंदाज येतो. त्याशिवाय अभ्यासक्रमात जे अध्याहृत आहे (between the lines) तेही मागील प्रश्नात सापडते. PYQ आणि अभ्यासक्रम हे UPSC-MPSC चे दिशादर्शक दीपस्तंभ आहेत. मागील UPSC व मागील वर्णनात्मक राज्यसेवेच्या प्रश्नांचे संकलन लोकायनने प्रकाशित केले आहे.
३) नियोजनाचा मंत्र संपूर्ण वर्षाचे आधी नियोजन करून मग सहा-सहा महिन्यांचे, त्यानंतर महिन्यांचे व शेवटी दिवसांचे नियोजन करणे असा क्रम ठेवता येईल. रोज निदान दोन विषयांचा अभ्यास केला तर तो जास्त उत्पादक ठरतो. नियोजन पूर्ण आठवड्याचे न करता आठवड्यातील एक दिवस सुट्टी ठेवावी. (कैदी पण सुट्टी घेतात!) ते आपल्या सामाजिक आरोग्यासाठी योग्य ठरते. नियोजनात उजळणीसाठी जागा सोडावी लागेल. उजळणीशिवाय अभ्यास म्हणजे पुढचे पाठ आणि मागचे सपाट. (RRR – Read, Revise, Repeat)
४) Basic to advance राज्य शासनाची आठवी ते बारावीची पाठ्यपुस्तके केली नसतील तर करून घ्या. NCERT मधील संकल्पना स्पष्ट करून घेणे ही महत्त्वाची पायाभरणी आहे. अभ्यासाचा पाया जितका भक्कम असेल, तितके यश समीप. NCERT चा मराठीत सारांश असलेले पुस्तक लोकायनने काढले आहे. त्यामुळे वेगवेगळ्या NCERT घेण्याची गरज संपुष्टात आली आहे.
५) निबंधाची शास्त्रीय मैफिल निबंधासाठी वृत्तपत्रातील रविवारच्या पुरवण्यांचे बारकाईने वाचन आवश्यक आहे. आपण सर्व वाचनीय लेख लोकायनच्या टेलिग्राम चैनलवरून महत्त्वाचे भाग अधोरेखित करून टाकत असतो. त्याचा जरूर फायदा घ्या. (@lokayaniasacademy) दर पंधरा दिवसांनी एक अशा क्रमाने अवांतर पुस्तकांचे वाचन करा. आपला वैचारिक परीघ विस्तृत करणाऱ्या अशा चांगल्या पुस्तकांची यादी आपण उपलब्ध करून दिली आहे. काही पुस्तकांचे व्हिडिओ परीक्षण पाहिले तर वाचायचा वेळ वाचतो व कामाचे मुद्दे मिळून जातात. लोकायनच्या youtube चॅनलवर (@lokayanofficial) बुक रिव्ह्यू या प्लेलिस्टवर तुम्ही ही परीक्षणे कधीही ऐकू व बघू शकता.
६) आज की ताजा खबर चालू घडामोडींसाठी रोजचे वर्तमानपत्र व दर महिन्याला मासिक असा क्रम चालू द्या. चालू घडामोडी नित्यनेमाने करा. सुरुवातीचे काही महिने जास्त भर (८०%+) अभ्यासक्रमातील नियमित (static) विषयांना द्या. अभ्यासाच्या शेवटच्या टप्प्यात चालू घडामोडी ऐरणी वर घेणे फायद्याचे ठरेल.
७) अभ्यासाचा पुरावा : सराव चाचण्या आधी पूर्व परीक्षा व नंतर मुख्य परीक्षांची टेस्ट सिरीज सोडवणे नितांत आवश्यक आहे. त्याचे वेगळे नियोजन करणे गरजेचे. त्यातून अभ्यासाला दिशा व गती मिळते. तसे न केले तर आपली झाकली मूठ सव्वा लाखाची ठरते. लोकायनने पूर्व परीक्षेसाठी (निश्चय) व मुख्य परीक्षेसाठी (दृढनिश्चय) ही टेस्ट सिरीज ऑनलाईन व ऑफलाइन अशा दोन्ही मोडमध्ये उपलब्ध करुन दिली आहे.
८) संख्या की दर्जा? अभ्यासाची लक्ष्ये (target’s) संख्यात्मक (Quantitive) म्हणजे इतकी पानं वाचून झाली पाहिजेत आणि गुणात्मक (Qualitative) म्हणजे इतक्या संकल्पना समजल्या पाहिजेत अशा दोन प्रकारे ठेवावी लागतील. प्राधान्य संख्यात्मक लक्ष्याला द्यावे. म्हणजेच शब्द न शब्द अभ्यासक्रम कव्हर करणे हा अग्रक्रम असायला हवा. थोडा दर्जा कमीजास्त झाला तरी चालेल. पण आधी अभ्यासक्रम आवाक्यात आला पाहिजे. (Range instead of depth)
९) मुंगी उडाली आकाशी, तिने गिळले सूर्याशी तपशिलात देव असतो. काही गोष्टी या बैजवारच झाल्या पाहिजेत. • उत्तर लेखनासाठी काळया शाईचे पेन वापरणार की निळ्या? – एकच प्रकारचा पेन सुरवातीपासून शेवटपर्यंत. • रेघारहीत कागदावर लिहायचा सराव. • रोजचा व्यायाम व विश्रांती यांचे वेळापत्रक. • काळ, काम व वेग यांचे गणित मनात मांडत राहणे व सोडवून दाखवणे. • अभ्यासाची जागा निश्चित करून (पुरेसा प्रकाश, हवा व शांतता असलेली) तिथे समोर आपले ध्येय लिहून ठेवणे. • अभ्यासाचा काळ म्हणजे ९०% डोळ्यांचे व १०% तोंडाचे काम. ते प्रमाण सांभाळणे. • दिवसाची सुरुवात आज आपल्यापुढे कोणती लक्ष्ये आहेत याचा आढावा व दिवसाचा शेवट ती पूर्ण झाली की नाही याचा हिशोब, यापेक्षा वेगळा असता कामा नये.
MPSC राज्यसेवा मुख्य परीक्षेसाठी संदर्भ साहित्याची यादी (नवा पॅटर्न)
- निबंध एक कलाकृती – भूषण देशमुख
- होय! पर्यायी जग शक्य आहे विलास रणसुभे
- वेगळ्या विकासाचे वाटाड़े – दिलीप कुलकर्णी
- बखर पर्यावरणाची आणि ऐका विवेकी पर्यावरणवाद्याची – अतुल देऊळगावकर
- बहिष्कृत भारतातील अग्रलेख – रत्नाकर गणवीर
- जेव्हा माणूस जागा होतो – गोदावरी परुळेकर
- दुसरया फाळणीपूवीँचा भारत – डॉ दत्तप्रसाद दाभोळकर
- साधू, ज्याने आपली फेरारी विकली – रॉबिन शर्मा
- अल्केमिस्ट – साओ पाउलो
- माझंही एक स्वप्न होतं….. – वर्गीस कुरियन
- 1)समुद्रापारचे समाज २) जनांचे अनुभव पुसता – मिलिंद बोकिल
- बदलता भारत – भानू काळे
- व्ही द चेंज – संजय आवटे
- उद्या – नंदा खरे
- भुरा – शरद बाविस्कर
- पुस्तकाचे पान – भूषण देशमुख
- प्रशासनाच्या नव्या वाटा – शेखर गायकवाड
- प्रशासन नामा, बखर भारतीय प्रशासनाची – लक्ष्मीकांत देशमुख
- प्रशासन योग – अजित जोशी
- मोर ओडिशा डायरी – राजेश पाटील
- वर्दीतल्या माणसाची गोष्ट – सदानंद दाते
- मॅडम कमिशनर – मीरा बोरवणकर
- बुलेट फॉर बुलेट – ज्युलिओ रिबेरो
- भारतीय कला आणि संस्कृती – भूषण देशमुख, सकाळ प्रकाशन
- महाराष्ट्र :कला आणि संस्कृती – भूषण देशमुख, सकाळ प्रकाशन
- महाराष्ट्राची लोकयात्रा – सदानंद मोरे
- यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या नोटस (एम. ए. इतिहास)
- आधुनिक भारताचा इतिहास – लोकायनच्या नोट्स
- आधुनिक भारताचा इतिहास – सुमन वैद्य भाग १,२,३
- स्वातंत्र्योत्तर भारताचा इतिहास – सुमन वैद्य
- आधुनिक जगाचा इतिहास – सुमन वैद्य. भाग १, २ (निवडक भाग)
- भारतीय समाज – लोकायनच्या नोट्स
- भूगोल – राज्य शासन दहावी, अकरावी
- भारतीय अर्थशास्त्र – भूषण देशमुख/ हेमंत जोशी, लोकायन प्रकाशन
- अर्थजिज्ञासा – विनायक गोविलकर
- मला उत्तर हवय! – मोहन आपटे अ) पर्यावरण ब ) तंत्रज्ञान क) अणुशक्ती
- विज्ञान व तंत्रज्ञान – सचिन भस्के/ वैभव खूपसे
- आपत्ती निवारण – लोकायनच्या नोट्स
- महाराष्ट्र स्टेट बोर्ड – तत्वज्ञान (११वी आणि १२वी)
- आपले विचारविश्व – के. र. शिरवाडकर (भारतीय व जागतिक विचारवंतांसाठी)
- नैतिकता – सुब्रह्मण्य केळकर
- नैतिकता – लोकायनच्या नोट्स
- पुणे विद्यापीठाचे परामर्श मासिक
- भारत वार्षिकी – प्रकाशन विभाग (हिंदी)
- राज्यशास्त्र – लक्ष्मिकान्त (मराठी)
- भारताचे संविधान – घांगरेकर
- रोजचे वर्तमान पत्र – लोकसत्ता, Indian Express
- लोकराज्य मासिक (मराठी)
- NCERT मराठी – गौरव कोटेचा
- भारतीय कला व संस्कृती – भूषण देशमुख सकाळ प्रकाशन
- भारताचा इतिहास – ग्रोव्हर
- ८ ते १० वी विज्ञानावर पुस्तके – राज्य शासन/ Lucent GK (मराठी)
- अंकगणित व बुद्धिमत्ता – सचिन ढवळे
- ७ वी स्कॉलरशीप गाईड – नवनीत
- NTS, MTS ची पुस्तके
- प्रश्नसंच – संदीप आरगडे/ अभिषेक ठिगळे
